Sunday 25 October 2009

निसर्ग... रेखाटन

सध्या मारुती चितमपल्लींच "जंगलाचं देणं" हे पुस्तक वाचतोय... पुस्तक
छानच आहे... त्यात काही निसर्गाची रेखाटनं आहेत... मला ती खूप आवडली
म्हणून मी ती रेखाटली...

एका तळ्याकाठी...



हिमालयाच्या कुशीत...



स्वप्नातलं घर...



मी कश्याला आरश्यात पाहू...

Tuesday 20 October 2009

आजीबाई... एक रेखाटन

एव्हरेस्टच्या पायथ्याशी आयुष्य पीकवलेल्या तीबेट मधल्या एका आजीबाईचं रेखाटन...
NATIONAL GEOGRAPHIC JOURNAL मधे हा फोटो आहे...



तीबेट मधल्या Rongbuk Monastery मधे ही आजीबाई राहायची... १९७० च्या सुमारास चीनी लोकांनी ह्या Monastery ची वाट लावली... त्यानंतर बरेच वर्ष एका गुहेत ही आजीबाई इतर काही लोकांसोबत राहीली...

१९२० मधे तीबेट मधुन एव्हरेस्टवर चढताना George Leigh Mallory ने Rongbuk चा base camp म्हणून वापर केला होतो...

हे रेखाटन मी 10 x 10 cm च्या चौकोनात काढलयं... रेखाटन जरा लहान झालं, त्यामुळे शेडींग नीट नाही जमलं...

Wednesday 14 October 2009

कामशेत - बेडसे लेणी - भातराशी... डोंगररांगेच्या माथ्यावरुन...

भाजे, कार्ला, कोंडाणे आणि बेडसे ही सर्व लेणी साधारण 1st cent. B.C. कालखंडातली आहेत. ह्यापैकी फक्त बेडसे लेणी बघायची राहिली होती. एकच दिवस भटकायला मिळणार होता; म्हणून येत्या रवीवारी बेडसे लेणी बघायचं ठरवलं. लेण्यापर्यंत चाललोच आहोत तर त्याच्या मागचा भातराशीचा डॊंगरपण बघुयात असा विचार डोक्यात आला. कामशेतहून टमटमने लेण्यापर्यंत जाता येतं, पण त्यात काय मजा नाही.
मग कसं जायचं?
विसापुर किल्यापासून एक डोंगररांग कामशेतच्या रेल्वे स्टेशन पर्यंत आली आहे. ह्याच डोंगररांगेवर बेडसे लेणी आणि भातराशी आहे. लोकलने कामशेतला उतरायचं... डोंगररांगेच्या माथ्यावरुन चालतं बेडसे लेणी गाठायची... मग भातराशी आणि शेवटी मळवली... असा बेत पक्का केला.



रवीवारी सकाळी ७.३० ला मी आणि माझा भाऊ प्रसाद कामशेतला पोहचलो. जुना पुणे-मुंबई रस्ता ओलांडला आणि समोरच्या डोंगररांगेवर चढायला सुरुवात केली. सरळ रेषेत चढून डोंगररांगेचा माथा गाठायचा आणि मग पायवाट शोधायची, असा विचार होता.

धुकं हळुहळू विरळ होत होतं आणि सकाळच्या कोवळ्या उन्हाची उब जाणवत होती. सारं रान दवाने ओलचींब भिजलं होतं. एखाद्या झुडपातून वेडाराघू (green bee-eater) हवेत झेप घ्यायचा, चोचीत काहीतरी पकडुन पुन्हा झाडीत नाहीसा व्हायचा. रंगीबेरंगी फुलपाखरं फुलांमधला मध खाण्यात दंग होती.

(White Lady)


(रान भेंडी)


(कारवी)


(गणेशवेल)






झुडपातून वाट काढत थोड्याच वेळात डोंगररांगेच्या माथ्यावर पोहचलो.  सकाळच्या गार हवेत जरावेळ विसावलो. समोर दूरवर भातराशीचा डोंगर दिसत होता.



पुसटश्या पायवाटेवर चालायला सुरुवात केली. ही वाट रोजच्या वापरातली नव्हती, आणि पावसात बरच गवत माजल्यामुळे थोड्याच वेळात पायवाट नाहीशी झाली. बराच वेळ झाडा-झुडपात भटकल्यावर गुरांच्या वाटेला लागलो.



थोडं पुढे गेल्यावर लहानश्या पठारावर पोहचलो. पठारावर गुरांचा कळप चरत होता, गुरांना चाहूल लागू न देता झाडीतून आम्ही पुढे सरकलो.



पुणे-मुंबई मेगाहायवे वरुन मुंबई कडे जाताना कामशेत बोगद्याच्या उजव्या बाजूला डोंगरावर एक टॉवर दिसतो, आम्ही चालत असलेल्या डोंगररांगेवरच हा टॉवर आहे.  टॉवर असलेल्या टेपाडाला डावी कडून वळसा घालून बोगद्यावरच्या खिंडीत असलेल्या वाघोबाच्या देवळात पोहचलो. दर्शन घेऊन पुन्हा चालायला लागलो. गवत तुडवत एका टेपाडावर आलो. इथून समोरच्या डोंगराच्या पोटात कोरलेली बेडसे लेणी दिसली. जरा हुश्श् झालं, कामशेतहून ३ तास चालल्यानंतर पहिल्यांदाच लेणी दिसली.

(फोटोच्या मध्यभागी लेणी दिसत आहेत)


लेण्याचा डोंगर आणि आमच्या मधे लहानशी दरी होती. लेण्यापर्यंत पोहचण्यासाठी अजीबात वाट नव्हती आणि उतार पण खूप जास्त होता. जरा मागे जाऊन योग्य वाट शोधावी असा विचार थोडावेळ डोक्यात आला, पण अशावेळी मी डोक्याचं अजीबात ऐकत नाही आणि मनाला लगामपण लावत नाही. मग काय?... उतारावरच्या रानात आम्ही दोघांनी उडी घेतली. झपाटल्या सारखे रान तुडवत उतरायला लागलो. पाठपीशवी, शर्ट सारखे काट्यात अडकत होते... अंग काट्यांनी ओरबाडुन निघालं... पण न थाबंता थेट लेण्याच्या जवळ पोहचलो आणि ओढ्यात आडवे झालो. ओढ्याच्या गार पाण्यानं सारा थकवा दूर केला. मग थोडं चढल्यावर लेण्यात प्रवेश केला.

इतके श्रम केल्यावर असं सुंदर शील्प बघण्यातली मजा वेगळीच; टमटमने इथे आलो असतो तर हे सुख नसतं मिळालं.
२००० वर्षांपूर्वी काही लोकांनी निर्माण केलेली कलाकृती आपण आज प्रत्यक्ष बघतोय, ह्यावर थोडावेळ विश्वासच बसत नव्हता. एखाद्या निर्जीव कातळातून असं सुंदर, चिरंतन शील्प कोरणाऱ्या लोंकाच्या प्रतीभे समोर नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्यायचं उरत नाही.  हे सौंदर्य शब्दामधे मी वर्णनच करु शकत नाही.

























भारावून बराच वेळ लेणी बघीतली. तोपर्यंत लेण्यांची देखरेख करणारे सदुकाका आले. त्यांच्या सोबत घरुन आणलेलं खाऊन घेतलं.
मी विचारलं,"लेणी बघण्यासाठी थोडं तीकीट का ठेवत नाही? भाजे आणि कार्ल्याला तर आहे"
"कोणी येतच नाही इथे, मग तीकीट ठेऊन काय फायदा?"
खरंतर ही लेणी फार सुंदर आहेत, पण भाजे आणि कार्ल्याच्या मानानं जरा आडवाटेला असल्यामुळे फारसं कुणी येत नाही.
अतीशय थोडकं मानधन सदुकाकाला दिलं आणि लेण्याच्या वर चढून भातराशीच्या दिशेने चालायला लागलो.  एका दगडावर प्रसादला साप दिसला. फारच निवांत होता, जवळ गेलोतरी त्याने पळायची घाई नाही केली.

(Gunther's racer)


वाट सापडत नव्हती, पण साधारण कल्पना असल्यामुळे  गवतातुन  वाट काढत चालत होतो.  थोड्याच वेळात डोंगराच्या कड्यावर पोचलो आणि तळ न्याहाळू लागलो. पवनेच्या दोन काठावर तिकोना आणि तुंग, पवनेच्या पाण्यात पाय सोडून निवांत बसले होते.



आता उजव्या हाताला वळलो आणि पुन्हा जंगलात घुसलो.  मला ओल्या रानाचा वास खूप आवडतो. कोवळ्या गवताचा, फुलांचा, झाडांवरच्या फळांचा, कुजणाऱ्या पानांचा मिळून वेगळाच सुगंध तयार होतो. हा सुगंध आला की फार प्रसन्न वाटतं मला.

जंगलातून बाहेर पडलो तेव्हा उजव्या हाताला भातराशीचा डोंगर होता आणि समोर लोहगड आणि विसापूर.



अजूनपण वाट सापडत नव्हती. सकाळ पासून चालून-चालून प्रसाद जरा कंटाळला होता.
म्हणाला,"तुला वाट माहिती नव्हती तर कश्याला आणलसं इथे?"
मी म्हणालो,"अरे, वाट तर मला कधीच माहिती नसते...  तु कंटाळू  नकोस... मस्त चालत रहा... "

थोडावेळ धडपडल्यावर जरा मळलेल्या वाटेला लागलो. सुमारे अर्धा तास चालल्यावर एक धनगरपाडा लागला. धनगरपाड्याचं नाव मालेगाव.  गावातली लहान मुलं टायर सोबत खेळत होती. मला लहानपणची आठवण झाली... तेव्हा सायकलच्या दुकानतून वापरात नसलेला टायर घेऊन गावभर आम्ही हुंदडायचो... घरी आल्यावर टायर बघीतल्यावर आई ओरडते म्हणून घरात घुसायच्या आधी पडवीच्या छतावर टायर लपवून ठेवायचो... मजा होती तेव्हा...

धनगरपाड्यातून विसापूरच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात जायला मळलेली वाट आहे.  दिवसभर भरपूर पायपीट झाली होती, म्हणून भातराशीचा डोंगर न चढता पाटणला उतरायचं ठरवून टाकलं. अर्ध्या तासात पाटण आणि मग अजून पाव तास चालल्यावर मळवलीच्या रेल्वे स्टेशनला पोहचलो. लोकल मधे बसलो आणि पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला. लोकलच्या खिडकीतून भातरशीचा डोंगर,  दिवसभर भटकत होतो ती डोंगररांग बघीतल्यावर फार समाधान वाटलं.

Wednesday 7 October 2009

कुलंग... जेथे आकाश ठेंगणे वाटते... (kulang)

"येत्या विकऐंडला कुलंगला जायचा बेत आहे... येतोस का?" असा राहुलदादाचा SMS आला...

खूप दिवसांपासून मला कुलंगला जायच होतं... कळसुबाईच्या कुशीत अलंग, मदन आणि कुलंग विसावले आहेत... इगतपुरीच्या परिसरात अजीबात भटकलो नव्हतो... तिकडच्या डोंगररांगा जरा वेगळ्याच आहेत... आकाश सुद्धा ठेंगण वाटावं असे उंच डोंगर आहेत...

मग शुक्रवारचं काम संपवून मी बदलापुरला राहुलदादा कडे पोचलो... रात्री सगळी तयारी करुन झोपी गेलो... पहाटे ५.४६ च्या लोकलने कल्याणला पोचलो आणि मग कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलमधे चढलो... राहूलदादा, अरुण सर, निलीमा मँडम, अवळे सर आणि मी असे आम्ही पाचजण कुलंगला चाललो होतो...

कसाऱ्याला वडापाव-चहा घेतला आणि जीप ठरवून काळुस्त्याला पोचलो. गावकऱ्यां सोबत थोड्या गप्पागोष्टी झाल्यावर कुलंगवाडीच्या (कुरुंगवाडी) वाटेवर चालायला सुरुवात केली. शेताच्या बांधावरुन ही वाट जात होती. दूरवर एका डोंगराच्या मागून कुलंग आणि त्याचा धाकटा भाऊ - छोटा-कुलंग मान वर काढून आमच्याकडे बघत होते. कुलंगवाडीहून दळणासाठी काळुस्त्याला चाललेले काही गावकरी वाटेत भेटले. त्यांच्या मते, "आम्ही काळुस्त्याला न येता, आंबेवाडीला जायला हवं होतं" कारण ते जवळ पडलं असतं, पण भटकायला निघाल्यावर जवळ-दूरचा सवालच नव्हता.

ह्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे भाताची शेतं जरा वाळली होती; रोपं जरा पिवळी पडली होती. शेताच्या कुंपणावर घाणेरी फुलली होती. दीड तास चालल्यावर कुलंगवाडीच्या पठारावर पोचलो. समोर छोटा-कुलंग पासून सुरु झालेली डोगंररांग डाव्या हाताला दूरवर कळसुबाई पर्यंत पसरली होती. अंगा-पिंडानं धष्टपुष्ट असलेला कुलंग अगदी उठून दिसत होता.

(उजवी कडून दुसरा डोंगर म्हणजे कुलंग)


हिरव्यागार पठारावर नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या पायवाटेवरुन आम्ही पुढे सरकत होतो. दुपारच्या उन्हाचे चटके आता जाणवत होते. थोडावेळ आराम करण्यासाठी एका ओढ्याकाठी विसावलो. थोडंफार खाल्लं, पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या आणि कुलंगच्या दिशेने चालायला लागलो. 
पठार सोनकीच्या फुलांनी बहरलं होतं. बाळाला जशी आईची ओढ असते, अगदी तशीच सोनकीला उन्हाची ओढ असते. दुपारच्या उन्हात सोनकीचं सौंदर्य जास्तच खुलून दिसतं. सोनकीला 'सोनावळी' असं सुद्धा नाव आहे.



गळ्यातली घंटा वाजवत, पठावरचं कोवळं, लुसलुशीत गवत खात गुरं भटकत होती आणि त्यांचा गुराखी एका झाडाच्या सावलीत हाताची उशी करुन निवांत पहूडला होता. काय ते सुख!!! मन संतुष्ट असेल तर उपाशी पोटी सुद्धा छान झोप लागते.

पठारावर अनेक पायवाटा फुटल्या होत्या. आता पायवाटेकडे जास्त लक्ष न देता, कुलंग आणि मदन मधल्या खिंडीच्या दिशेने सुटलो. दुपारी १.३० च्या सुमारास एका ओढ्यात जेवणासाठी थांबलो. वाहत्या पाण्याचा खळखळाट ऐकत, ओढ्यामधल्या दगडावर बसून जेवायला (ठेपले, छुंदा आणि लाडू) सुरुवात केली. तहान लागली की बसल्या जागीच जरा वाकून ओढ्यातलं पाणी प्यायचो. जेवणा नतंर थोडावेळ आराम केला आणि पुन्हा चालायला लागलो.

(मी...)


खूप जंगलतोड झाल्यामुळे पावसानंतर सुद्धा जंगल जरा विरळच भासत होतं. जंगलात गुरांच्या वाटा, लाकुडतोड्यांच्या वाटा आणि गडावर जाणाऱ्या वाटांच जाळं पसरल होतं. ह्या गोंधळात आम्ही वाट चुकलो आणि कुलंगच्या ऐवजी मदनच्या वाटेने बरच चढलो. चढत असताना, "आपण वाट चुकलोय... जरा खालूनच उजवीकडे वळायला हवं होतं..." असं सारखं राहुलदादा सांगत होता. आम्ही धरलेली वाट एका लहानश्या धबधब्यात संपली. मग मागे वळलो आणि बरच खाली गेल्यावर उजवीकडे कुलंगच्या दिशेने जाणारी वाट सापडली. ही वाट ओढा पार करुन कुलंगकडे जाते आणि ओढ्याला पाणी असल्यामुळे मगाशी वर चढत असताना ह्या वाटेचा अंदाज नाही आला. ओढ्यातल्या पाण्याने जरा ताजेतवाने झालो आणि कुलंगच्या वाटेला लागलो तेव्हा ३.३० वाजले होते. थोड्याच वेळात वरच्या पठारावर पोचलो. समोर मदनगड आणि त्याचं नेढं लक्ष वेधून घेत होते.



मदनगड मागे आणि कुलंग डाव्या हाताला ठेवून आडवं चालायला लागलो. अर्ध्या तासात, कुलंगवर चढणारी धार लागली.  धारे वरुन चढायला सुरुवात केली. खूप तीव्र चढ होता आणि धारेवर कारवीचं जंगल माजलं होतं. दीड माणूस उंच कारवी आणि बांबूमुळे पायवाट पूर्णपणे झाकली होती. पावसानंतर गडावर जाणारे आम्हीच पहिले होतो. मग एका सुकलेल्या कारवीचा बुंधा उपटला आणि त्याने कारवीचं जंगल झोडपत वाट शोधत झपाझप चढायला लागलो. घामाने संपूर्ण न्हाऊन निघालो होतो. दमलो की काही क्षण थांबायचो आणि मग परत कारवी झोडपत चढायचो. तासभर चढल्या नंतर, जरा अवघड कातळ-टप्प्याच्या पायथ्याशी जरा विसावलो.

(शेवाळं असलेला भाग फोटोत नाही आला...)


पावसामुळे शेवाळं साचलं होतं आणि पाठीवर अवजड पीशव्या घेऊन कातळ-टप्पा पार करणं जरा अवघड वाटत होतं. घसरण्याचा सवालच नव्हता कारण घसरलो तर गेलो ह्यात काही शंकाच नव्हती. तितक्यात निलीमा मँडमला एक भन्नाट युक्ती सुचली. आम्ही जवळ असलेले कापडी रुमाल शेवाळ असलेल्या ठीकाणी टाकले आणि त्यावरुन चालत तो टप्पा पार केला. सगळ्यात शेवटी एक-एक रुमाल उचलत मी तो टप्पा पार केला. आता पुढची वाट पण जरा बिकटच होती. नीट लक्ष देत चढत होतो. कातळात खणलेल्या उभ्या पायऱ्या चढून गडावर पोचलो तेव्हा संध्याकाळचे ६.१५ वाजले होते. गड दाट धुक्यात बुडाला होता. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या हाताला हाकेच्या अंतरावर गुहा आहे. दगड फेकून, जरा आवाज करुन गुहेची नीट पडताळणी केली. गुहेच्या एका भागात पाणी साठलं होतं आणि उरलेल्या भागात जरा ओलावा होता. ओलावा असलेल्या भागात सगळं सामान पसरलं. आम्ही गडावरच्या टाक्यातून पाणी आणे पर्यंत, अरुण सरांनी गँस पेटवून सूप तयार केलं. दिवसभराच्या मेहनती नंतर गडावरच्या गारव्यात गरम-गरम सूप पिण्या सारखं दूसरं सूख नाही. त्यानंतर सगळेजण रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागले. व्हेज-पुलाव, पापड आणि आंबा-बर्फी असा जेवणाचा बेत होता. जेवण आटपून, अंथरुण-पांघरुण पसरुन झोपायला रात्रीचे १० वाजले. दिवसभर खूप दमछाक झाली असल्यामुळे नीटशी झोप लागली नाही. मधेच उठून टॉर्च लावला तर एक भला मोठ्ठा खेकडा राहुलदादाच्या उश्याशी बसला होता.



त्याला फास लावून पकडला आणि गुहेच्या बाहेर सोडून दिला. परत जरा वेळ अंथरुणावर पडून राहिलो. झोप काही लागत नव्हती, मग मी पहाटे ५.३० ला उठून गुहेच्या वर जाऊन सुर्योदयाची वाट बघत बसलो. गार वाऱ्यामुळे खूप थंडी पडली होती. पहाटेच्या मंद तांबड्या प्रकाशात डोंगर सुद्धा झोपी गेल्या सारखे भासत होते.

(मदन, अलंग आणि कुलंग)


थोड्याच वेळात तांबडं-केशरी सुर्यबिंब कळसुबाईच्या मागून वर आलं आणि कोवळं उन्ह खाली झिरपू लागलं. कोवळ्या उन्हाचा स्पर्श होताच पक्ष्यांना जाग आली आणि खालचं जंगल जिवंत झालं. डोंगर सुद्धा कोवळ्या उन्हात न्हाऊन ताजे टवटवीत झाले. भान हरपून मी सृष्टीच चैतन्य अनुभवत होतो. अशा काही क्षणांनीच आपलं आयुष्य सजलेलं असतं.



सकाळच्या नाष्त्याला नूडल्सचा उपमा आणि चहा होता. ते आटपून गडावर भटकायला निघालो. सारा गड वेगवेगळी फुलं माळून नटला होता. सोनकी, तेरडा, निसूर्डी, नभाळी, पांडा, श्वेतांबरा आणि असंख्य फुलांनी गड सजला होता. सोबत अवळे सर असल्यामुळे प्रत्येक फुलाबद्दल छान माहिती मिळत होती; वेगवेगळ्या फुलांची नावं त्यांच्यामुळेच कळाली.

(काळी निसूर्डी)


(नभाळी)


(पांडा)


(श्वेतांबरा)


(पान-तेरडा)


(शेपुट हबेनारीया... ground orchid)


हिरव्यागार रंगात सजलेला छोटा-कुलंग फारच छान दिसत होता. आज पर्यंत छोटा-कुलंगवर कोणा माणसाचे पाय पडले नाहीत. "एखाद्या डोंगरावर आजपर्यंत माणूस पोचलाच नाही" हे ऐकायला जरा विचीत्रच वाटतं ना?...
कुलंग वरुन तळकोकणात थेट १४०० मीटर खाली डोकावता येतं. इगतपुरीच्या परिसरातले जवळ-जवळ सगळेच डोंगर कुलंगच्या माथ्यावरुन ओळखता येतात.  गडावर फारसं बांधकाम नाही, पण कातळात खणलेली अनेक पाण्याची टाकी आहेत.

(नागाच्या फण्या सारखा आकाशात घुसलेला छोटा-कुलंग )


दुपारच्या जेवणाला अरुण सरांनी चायनीज राईस बनवला होता. सोबत सोया सॉस, टोमँटो सॉस आणि चायनीज जेवणाकरता लागणारे सगळे जिन्नस होते. पोटाचे इतके लाड तर घरी सुद्धा होत नाहीत. जेवणा नंतर थोडावेळ गप्पागोष्टी झाल्या, चहा झाला आणि परत हुंदडायला निघालो. कातळात खणलेल्या नितळ पाण्याच्या टाक्या जवळ बसून, बराच वेळ खालचं कोकण न्याहाळलं. संध्याकाळ होताहोता धुकं पडायला सुरुवात झाली. धुक्यामुळे सुर्यास्त दिसला नाही, पण धुकं जरा विरळ झालं की काळ्या ढगांमधून पाझरणाऱ्या संधीप्रकाशामुळे सारा आसमंत सोनेरी भासत होता. भटकून गुहेत पोचलो तेव्हा अंधारलं होतं. मस्त पालक-कॉर्न सूपचा आस्वाद घेत गुहेच्यावर बराच वेळ बसून राहिलो. आता धुकं अजीबात नव्हतं... एक-एक करत कोकणातले दिवे पेटत होते आणि वर आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. दोन दिवसापूर्वीच अमावस्या झाली होती, त्यामुळे काळ्या आकाशात चांदण्या जास्तच उठून दिसत होत्या. आजुबाजूला गुडूप काळोख आणि वर-खाली टिमटीमणारा प्रकाश असा वेगळाच अनुभव होता तो.

भात, आमटी आणि बटाट्याची भाजी असं रात्रीच जेवण होतं. जेवण उरकून लवकरच झोपी गेलो. आज फारच वेगळा दिवस जगलो. कसलीच घाई नव्हती; चिंता नव्हती... केवळ स्वच्छंदपणा, निवांतपणा होता. आज रात्री मस्त झोप लागली. पहाटे लवकर उठून परत सुर्योदयाची वाट बघत बसलो. कितीही वेळा सुर्योदय पाहिला तरी दरवेळेस तो वेगळाच जाणवतो. उजेडल्यावर कुलंग आणि आजुबाजूचे डोंगर ढगाच्या सागरातून मान वर काढून एकमेकांकडे बघत होते.



चहा आणि फोडणीचा भात खाल्ला आणि निघण्याच्या तयारीला लागलो. गुहा होती तशी स्वच्छ केली, केलेला कचरा पिशवीत भरुन सोबत घेतला आणि सकाळी ८.३० ला उतरायला सुरुवात केली.

(ह्या गुहेत २ दिवस राहिलो...)


चढण्यापेक्षा उतरणं नेहमीच अवघड असतं, त्यामुळे जपूनच उतरत होतो. अवघड कातळ-टप्पा पार केल्यावर जरावेळ आराम केला. आता कारवीच्या जंगलातून उतरताना सारखं घसरायला होत होतं. उतार संपल्यावर जरा निवांतच चालत कुलंगवाडीच्या पठारावर पोचलो.

(उतरताना काढलेला कुलंगचा फोटो...)


दुपारच्या उन्हामुळे खूप दमायला होत होतं. थोडावेळ थांबलो आणि सोबत असलेलं खावून घेतलं. परत काळुस्त्याच्या वाटेला लागलो. बरेच गावकरी लाकडाची अवजड ओझी घेऊन काळुस्त्याला चालले होते. त्यांच्याशी बोलल्यावर कळालं, की आता काही दिवसात काळुस्त्याला धरण बांधणार आहेत; पावसाचं पाणी साठवून ठेवायला. म्हणजे काही महिन्यानंतर काळूस्त्याहून कुलंगला जाता येणार नाही. आंबेवाडी वरुन मात्र जाता येईल. भर उन्हात चालत सुमारे ४.३० वाजता आम्ही काळुस्त्याला पोचलो. पोचल्यावर काही क्षणातच आभाळ भरुन आलं आणि मुसळधार पाऊस कोसळायला लागला. "संपूर्ण पावसाळ्यात असा पाऊस पडला नाही", असं गावकऱ्याचं म्हणणं होतं. एक तास पाऊस कोसळत होता. पाऊस थांबल्यावर वातावरणात मस्त गारवा पसरला.

टमटम ठरवली आणि घोटीच्या दिशेने निघालो. उन्हामुळे सुकलेली शेतं, आत्ताच्या पावसात पाणी पिऊन टवटवीत झाली होती. डोंगरावरून गढूळ पाण्याच्या धारा खाली कोसळत होत्या. अनपेक्षीत पणे पडलेल्या पावसामुळे सगळेच सुखावले होते. गेल्या तीन दिवसात जे काही अनुभवलं त्यामुळे सर्वजण खूप खूष होते. अर्ध्या तासात घोटीला पोचलो. मी घोटीला उतरुन सीन्नरला जाणाऱ्या ट्रक मधे बसलो. राहुलदादा, अरुण सर, निलीमा मँडम आणि अवळे सर त्याच टमटमने कसाऱ्याला निघाले. घोटी वरुन सीन्नरला जाणारा रस्ता फारच रमणीय आहे. एक तासात सीन्नरला पोचलो आणि पुण्याला जाणारी बस धरली. घरी पोचायला रात्रीचे १२ वाजले.

गेल्या तीन दिवसात बरीच धडपड केली होती, पण जे काही अनुभवलं ते केवळ स्वप्न होतं. बऱ्याच नवीन लोकांशी ओळखी झाल्या, नवीन प्रदेश बघितला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तीन दिवस मनसोक्त भटकलो...