Wednesday, 17 February 2010

रोहिडा किल्ला...

मागच्या वर्षी रोहिड्याला गेलो होतो... तेंव्हाचे काही फोटो...
जाताना पुणे - भोर - बाजारवाडी असा प्रवास केला आणि मग रोहिडा किल्ला चढलो...
उतरताना रोहिडा किल्ल्याहून नाझरेला उतरलो... मग आंबवडे गावातल्या नागेश्वराचं दर्शन घेऊन पुण्याला परतलो...

रोहिडा किल्ला... बाजारवाडीहून चढताना


रोहिडा किल्ला... नाझरेला उतरताना


नाझरेला उतरतानाचा सुंदर नजारा...




बैलोबा...


नाझरे गावात शेताच्या कुंपणात फुललेलं सुंदर फुल...


आंबवडे गावातलं नागेश्वराचं मंदिर...


मंदिराच्या परिसरातल्या एका झाडावरचा मधमाश्यांचा पोळा... ह्याला काहीतरी वेगळं नाव आहे... मला ते माहिती नाही...

Thursday, 4 February 2010

प्लस-व्हॅली...

समोर प्रचंड खोल दरी... नजर जिथपर्यंत भिरकावता येईल तिथपर्यंत सृष्टीचं अमाप सौंदर्य... आजुबाजुला उत्तुंग कडे... वातावरणात फक्त पक्ष्यांचा चिवचिवाट... निखळ एकांत... हे सगळं अनुभवत मी प्लस-व्हॅलीच्या टोकावर उभा होतो...



त्याक्षणी शरीरानं मनावर घातलेली सगळी बंधनं गळून पडली आणि मनाला काहीच अशक्य राहिलं नाही... मन एखाद्या पाखरा प्रमाणे कड्यावरुन दरीत झेप घेत होतं... कधी कड्यावर तर कधी झाडाच्या शेंड्यावर जावून बसत होतं... मी सुद्धा ह्या सृष्टीचाच अविभाज्य अंग आहे असं वाटलं... झाडं, दगडगोटे, पक्षी, प्राणी, हवा आणि मी ह्यांच्यात काहीच फरक नव्हता... मी म्हणजेच हे सगळं आणि हे सगळं म्हणजेच मी असं वाटून गेलं... मग कसलं जंगल? आणि कसलं रान?, सगळच ओळखीचं झालं आणि कसलीच भिती उरली नाही... खऱ्या अर्थानं विमुक्त झालो... "The soul of the universe is one with your own soul and every other soul that exists " असं Paulo Coelho का म्हणतो ह्याचं उत्तर मिळालं...

पुण्याहून प्लस-व्हॅलीकडे जाताना मुळशीच्या पुढे पळसे नावाचं गाव लागतं... हे गाव मागे टाकून पुढचा रस्ता धरला आणि रस्त्याच्या दुतर्फा बहरलेल्या पळसाच्या झाडांनी आमचं स्वागत केलं... पळसाला इंग्रजीत "Flame of the forest" असं सुद्धा म्हणतात... पळसाच्या फुलांमधे भरपूर मध असतो आणि तो खाण्यासाठी पळसाच्या झाडावर पक्ष्यांची खूप गर्दी असते... बहरलेल्या पळसाच्या झाडा खाली पडलेला फुलांचा सडा बघून मन एकदम हरखून गेलं... फुलांचा तांबडट-केशरी रंग सकाळच्या उन्हात फारच उजळ दिसत होता... लहान मुल आईच्या कुशीत शांतपणे निजावं अगदी तशीच फुलं मातीच्या कुशीत निजली होती...





निवे गाव आणि लोणावळ्याचा फाटा मागे टाकून थोडं पुढे गेलो की घाटातून प्लस-व्हॅली दिसते... चार दऱ्या एकत्र येऊन अधिकच्या आकाराचं चिन्ह तयार झालयं म्हणून ह्या दरीला प्लस-व्हॅली असं म्हणतात...



दाट झाडीतून दरीत उतरायला साधारण एक तास लागतो...

(दरीत उतरताना डाव्या हाताला भिरा धरण दिसतं)


देवानं स्वर्गाचं दार उघडून,"जा बाबा! हवं ते पहा... हवं तसं भटक..." असं म्हंटल्या सारखं वाटलं...

(ओढ्यातलं नितळ पाणी)


(दरीतून दिसणारा देखावा)




पक्ष्यांची गाणी ऐकत, ओढ्यातल्या नितळ पाण्यात आकाशाचं प्रतिबिंब बघत दरीच्या टोकापर्यंत पोहचलो... दरीच्या अगदी टोकावर खूपच नितळ आणि गार पाण्याचं कुंड आहे...



पावसामधे प्लस-व्हॅलीच्या चारी सोंडांमधून वाहणारं पाणी ह्या कुंडात पडतं... ह्या कुंडातूनच पाणी शेवटी खाली दरीत कोसळतं...



असं अफाट सौंदर्य पाहून निव्वळ वेड लागल्यागत झालं... कितीही वेळा पाहिलं तरी ते डोळ्यामधे सामावत नव्हतं... दरीची खोली, रानाची हिरवाई, ओढ्यातलं पाणी आणि एकांत ह्यामुळे मनाची लगाम सैल्ल होत होती... कधी ते फुलपाखरां सोबत उडत होतं तर कधी कुंडातल्या माश्यांसोबत पोहत होतं... बराच वेळ दरीच्या टोकावर बसलो... नकळतच सारखे देवाचे आभार मानत होतो... उन्हं कलल्यावर शुध्दीवर आलो आणि हे सगळं जपलं पाहिजे अशी जाणीव परत झाली...

निसर्ग न मागता सगळंच आपल्याला देत असतो, पण आपण मात्र हवरटा सारखे ‘एकदम सगळी सोन्याची अंडी मिळावी म्हणून कोंबडीच कापायच्या विचारात असतो’... हे चुकतयं ह्याची आपल्याला जाणीव आहे... कळतयं पण वळत नाही अशी अवस्था आहे... खरंच हे सगळं जपलं पाहिजे... आता आपण सर्वांनीच ह्या साठी धडपड केली पाहिजे...

Man has been endowed with reason, with the power to create, so that he can add to what he's been given.  But up to now he hasn't been a creator, only a destroyer.  Forests keep disappearing, rivers dry up, wild life's become extinct, the climate's ruined and the land grows poorer and uglier every day. ~ Anton Chekhov

विनंती: मित्रांनो भटकून आलो की मला त्या जागे बद्दल लिहायला, इतरांना सांगायला आवडतं, पण मग भिती देखील वाटते की ‘तिथे गर्दी होणार, कचरा होणार आणि त्या जागेचं सौंदर्य टिकून राहिल की नाही? ’. माझी एक फार नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी निसर्ग/वन्यजिवन ह्यांच्या संवर्धनासाठीची जाणीव आपल्या ओळखीच्या लोकांमधे निर्माण करावी. जाणीव निर्माण झाली तर संवर्धन देखील होईलच.

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/

Tuesday, 2 February 2010

कोकणातली भटकंती...

सोमवारची रजा टाकून मस्त ३ दिवस सुट्टी मिळवली आणि दुचाकीवर कोकणात भटकून आलो... मी आणि रव्या असे आम्ही दोघेच होतो... काहीच प्लान नव्हता... "मिळेल ते खायचं, पडेल तिथे रहायचं आणि निव्वळ भटकायचं" हा एकच हेतु होता...  


पहिल्या दिवशी पुणे - महबळेश्वर - पोलादपूर - खेड - चिपळूण - मार्गताम्हाणे - वेळणेश्वर असा साधारण २९० कि.मी. चा प्रवास केला... दुपारी २ वाजता वेळणेश्वरला पोहचलो... वेळणेश्वरच्या समुद्र-किनाऱ्या वरुन संध्याकाळी सुंदर सुर्यास्त अनुभवला... रात्री निवांतपणे पुळणीत बसलो... पहाटेच्या कोवळ्या उन्हात सोनेरी समुद्र पाहिला...  
(आंबेनळी घाट) (मधु-मकरंद गड... आंबेनळी घाटातून) (नजारा... आंबेनळी घाटातून) (नजारा... आंबेनळी घाटातून) (वेळणेश्वरचा समुद्र-किनारा) (म्हावरा) (सुर्यास्त... वेळणेश्वर) (सुर्यास्त... वेळणेश्वर) (सुर्यास्ता नंतर... वेळणेश्वर) (सुर्योदय... वेळणेश्वर) (वेळणेश्वर मंदिर) दुसऱ्या दिवशी वेळणेश्वर - गुहाघर - धोपावे - दाभोळ - दापोली - हर्णे - केळशी - वेशवी - कोलमांडले - हरिहरेश्वर असा प्रवास केला... धोपावे ते दाभोळ आणि वेशवी ते कोलमांडले हा प्रवास बोटीने करावा लागतो... दुचाकी/चारचाकी आरामात बोटीत मावतात... आजची संध्याकाळ केळशीच्या समुद्र-किनाऱ्यावर घालवली... सुर्यास्ता नंतर उरलेला प्रवास करुन हरिहरेश्वरला पोहचलो...  
(आंजर्ले समुद्र-किनारा)  
(केळशी समुद्र-किनारा)  


तिसऱ्या दिवशी दुपारी १२ पर्यंत हरिहरेश्वरच्या समुद्र-किनाऱ्यावर भटकलो...  
(शंख... हरिहरेश्वर)
 
(चामू... हरिहरेश्वर) (खेकडा... हरिहरेश्वर) (हरिहरेश्वर समुद्र-किनारा) हरिहरेश्वरला दुपारचं जेवण उरकुन परतीचा प्रवास सुरु केला... हरिहरेश्वर - म्हसळा - माणगाव - निजामपूर - विळे - ताम्हिणी घाट - मुळशी - पुणे असा प्रवास केला... मुळशीच्या काठावरच्या सुरेख सुर्यास्ताने भटकंतीची सांगता झाली...  
(सुर्यास्त... मुळशी)  


(मी... मुळशीला सुर्यास्ताच्या वेळी)  


३ दिवस समुद्रात मनसोक्त पोहलो आणि खूप मासे खाल्ले... हलवा, सुरमाई आणि सुंगटं... खूप दिवसांनी इतके ताजे मासे खाल्ले... घाई नव्हती, चिंता नव्हती... वेळ होता, दुचाकी होती आणि भटकायची प्रचंड आवड... फार मजा आली... केवळ आनंदी आनंद...

Friday, 8 January 2010

दुर्ग आणि ढाकोबा... सह्यकड्याचे पहारेकरी

सह्यकड्याच्या टोकावर बसलो की कोकणातून वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श सुखावून जातो... नजर जाईल तीथपर्यंत कोकणात डोकावता येतं... एक विरळाच निवांतपणा जाणवतो... मागच्या वेळी ढाकोबाच्या माथ्यावरुन हे सगळं अनुभवलं होतं... ढाकोबाच्या परिसरात एकतरी मुक्कामी ट्रेक करायचा असं तेव्हाच ठरवलं होतं...

२-३ जानेवारीला सुट्टी असल्यामुळे भटकंतीला जायचं पक्क होतं... मी, अजित आणि ऋशी असे तीघेजण होतो... पुणे - जुन्नर - इंगळूण - दुर्ग - ढकोबा - आंबोली - जुन्नर - पुणे असा प्लान ठरला...



ठरल्या प्रमाणे शनीवारी सकाळी सुमारे १० वाजता जुन्नरला पोहचलो... जुन्नरहून इंगळूणला जाणारी ९.४५ ची बस चुकली आणि पुढची बस १२.३० ला होती... इतकावेळ बसची वाट बघण्यापेक्षा जीपने प्रवास करुया असं ठरलं... पुरेसे प्रवासी जमा होऊन जीप सुटायला ११ वाजले... जुन्नर सोडून घाटाच्या दिशेने निघालो की भवतालचा प्रदेश फारच सुंदर आहे... लहान-लहान गावांमधून रस्ता काढत साधारण ११.४५ वाजता इंगळूणला पोहचलो... पाटपीशव्या चढवल्या आणि भिवाडे गावाच्या दिशेने चालायला सुरुवात केली... भिवाडे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलयं आणि गावापर्यंत डांबरी रस्ता आहे... भिवाडे गावानंतर रस्ता सोडला आणि डोंगरवाट धरली... थोडावेळ चढल्यावर दूरवर उजव्या हाताला ढाकोबा दिसला...



शेळ्या-मेंढ्यांना चरायला सोडून एक आजोबा आंब्याच्या सावलीत निवांत बसले होते... आम्हाला बघून मस्त हसले... त्यांच्याशी इकडच्या-तीकडच्या गप्पा झाल्या आणि आम्ही पुन्हा डोंगर चढू लागलो... गार हवेमुळे दुपारचं उन्ह अजीबात जाणवत नव्हतं... थोड्यावेळात चढ संपला आणि पठारावरच्या आंबे गावात पोहचलो... समोर दूरवर झाडीत लपलेला दुर्ग आता खुणावू लागला... थोडावेळ चालल्यावर हातवीज गावी जाणारा डांबरी रस्ता सोडून उजव्या हाताला वळलो आणि दुर्गवाडीत पोहचलो...

(दुर्गवाडीतून दुर्ग असा दिसतो...)



अजून २० मिनीटं चालून दुर्गच्या पुढ्यात वसलेल्या दुर्गमातेच दर्शन घेतलं... 



इंगळूणहून इथपर्यंत चालत पोहचायला साधारण ३ तास लागले... (पर्यायी रस्ता वापरुन जुन्नरहून दुर्ग पर्यंत जीपनं येता येतं... संध्याकाळी (साधारण ५ च्या सुमारास) जुन्नर - हातवीज अशी मुक्कामी बस आहे...)

अगदी वेळेत मुक्कामाच्या जागी पोहचल्यामुळे भरपुर वेळ होता... मग दुर्गच्या मागे कड्याच्या टोकावर जावून बसलो... बसलो होतो त्याच्या डावी कडून एक जरा अवघड वाट कोकणात उतरते... ह्या वाटेला खुटेदार असं म्हणतात... कोकणातून खुटेदाराने वर चढताना जबरदस्त मजा येईल ह्यात काही शंकाच नाही... 

सुर्य ढगांच्या मागे लपला होता आणि हवा पण खूप धुसर होती, त्यामुळे वातावरणात जरा आळशीपणा जाणवत होता... पाकोळ्या (Mountain Swallow) आणि काही घारी आकाशात स्वच्छंदपणे तरंगत होत्या... कड्यावरुन बिनधास्त कोकणात झेप घ्यायची, हवेतच लहान किडे पकडून खायचे आणि परत झेप घ्यायची असं पाकोळ्यांच चालू होतं... काय उडतात ह्या पाकोळ्या!!! त्यांना उडताना बघताना आपण इतके अचंबित होतो की दुसरा कोणताच विचार डोक्यात येत नाही... केवळ परफेक्शन आणि एक्सलन्स... देवाची बेजोड कारिगरी...

पाकोळ्यांना उडताना बघून आमचा आळस कमी झाला आणि आम्ही दुर्गच्या माथ्यावर जाणारी वाट धरली... दुर्गमातेच्या देवळापासून १० मिनीटातच दुर्गमाथ्यावर पोहचलो... माथ्यावर दगडांचा सडा पडलाय... कोणत्याही प्रकारच्या बांधकामाचे अवशेष नाहीत... माथ्यावरुन ढाकोबा आणि भवतालचं जंगल असा सुरेख देखावा दिसतो...

(मध्यभागीचा उंच डोंगर म्हणजे ढाकोबा...)



ढगांमुळे सुर्यास्त आणि संधीप्रकाश असं काहीच अनुभवायला नाही मिळालं... काळोख पडायच्या आत दुर्गमातेच्या देवळा जवळ उतरलो... देवळा ऎवजी देवळापासून जवळच असलेल्या समाज-मंदिरात मुक्काम करायचं पक्क केलं... थोडं बांधकाम आणि पत्र्याची शेड असं ते समाज-मंदिर आहे... मुक्कामासाठी एकदम आदर्श जागा... इथून पाण्याची विहिरपण जवळच आहे... चुल उघड्यावरच मांडली आणि लाकडं गोळा केली... ह्यावेळेस मी सोबत फ्लींट (Flint) आणला होता आणि त्यानेच ठिणगी पाडून चुल पेटवायची होती (Man vs Wild मधे Bear Grylls करतो तसंच)... वाळलेलं गवत जमा केलं आणि ठिणगी पाडायला सुरुवात केली... ठिणग्या पडत होत्या मात्र गवत काही पेट घेत नव्हतं... जरा जास्त ठिणग्या पाडल्यावर गवताने पेट घेतला... पेटलेलं गवत चुलीत टाकलं आणि आग वाढवायचा प्रयत्न केला, पण वाढायच्या ऎवजी आग विजली... हा प्रकार ३-४ वेळा केला तरी चुल पेट घेत नव्हती... जवळ-जवळ अर्धा तास ठिणग्या पाडून हात दुखायला लागले... काळोख पण वाढला... सोबत काडेपेटी आणि केरोसीन किंवा कापूर असं काहीच नव्हतं आणलं... गरम-गरम खिचडी तोंडात पडणार की नाही अशी परिस्थीती आली... मुक्कामाच्या जागे पासून दुर्गवाडी साधारण १५ मिनीटांवर होती, मग गावात काडेपेटी आणि केरोसीन मिळतयं का? हे बघायला  ऋशी गेला... अजितचा ठिणगी पाडून आग पेटवायचा प्रयत्न चालूच होता... मी अजून वाळलेली लाकडं गोळा केली, पण तरीही चुल पेटत नव्हती... शेवटी काडेपेटी आणि केरोसीन घेऊन ऋशी आला आणि एका फटक्यात चुल पेटली... आगेची संकल्पना माहिती असून सुद्धा, लहानपणा पासून आग बघत असून सुद्धा एवढ्या कष्टा नंतर पेटलेली आग बघून फार काही मिळवल्याची अनुभुती झाली... आदिमानवाने पहिल्यांदा आग पेटवल्यावर त्याला काय वाटलं असेल? असा विचार डोक्यात आला...



काळ्याकुट्ट अंधारात पेटलेली चुल बघून उत्साह प्रचंड वाढला... अजितने चुलीवर मस्त खिचडी तयार केली... मग पापड, बटाटे आणि कांदे भाजून घेतले...

मेणबत्ती पण नव्हती आणली, मग अंधारातच गरम खिचडी, पापड, रोस्टेड बटाटे आणि कांदे यांचा आस्वाद घेतला... भरपूर गप्पा झाल्या... प्रचंड शांतता, गुडूप काळोख, दाट जंगल आणि आम्हा तिंघा व्यतीरिक्त कोणीच नाही... एकदम मस्त अनुभव होता... साधारण रात्री ९.३० ला झोपी गेलो... पहाटे ढगांमुळे सुर्योदय दिसला नाही... चुल पेटवून कोरा चहा केला... त्यात लिंबू पीळून मस्त लेमन-टी प्यायलो... गरम maggy चा नाश्ता केला...





सगळं सामान आवरलं आणि ढाकोबाला जायच्या आधी दुर्गमातेच दर्शन घेण्यासाठी देवळात गेलो... देवळा जवळच्या झाडावर शेकरु (Giant Squirrel) एका फांदी वरुन दुसऱ्या फांदी वर उड्या मारत बराच वेळ खेळताना पाहिलं...

दुर्गचा निरोप घेऊन ढाकोबाच्या दिशेने चालायला सुरुवात केली... दुर्ग ते ढाकोबा प्रवास बऱ्यापैकी फसवा आहे... जंगल आणि सारखे येणारे चढ-उतार ह्यामुळे बरोबर वाट शोधणं जरा अवघडच आहे... 



दुर्ग सोडल्यावर थोड्याच वेळात एका दरीच्या काठावर आलो... दरीत न उतरता काठानेच चालत साधारण १ तासात एका ओढ्यात पोहचलो... ओढ्यातलं पाणी खूप नितळ आणि गार होतं... संपूर्ण वर्षभर ह्या ओढ्यात पाणी असतं... पाण्यानं ओढ्यातल्या दगडांवर फार सुंदर कारिगरी केली आहे...





पाण्यात मस्त डुबून घेतलं, ताजे झालो आणि पुन्हा ढाकोबाच्या मार्गी लागलो... दाट झाडीतून चढून गेल्यावर पठारावर पोहचलो... इथून ढाकोबा अगदीच जवळ जाणवत होता...



ह्या पठारावरची उजव्या हाताची वाट ढाकोबाच्या देवळात जाते... देवळाकडे न जाता आम्ही सरळ ढाकोबा कडे जाणारी वाट धरली... अजून एका चढा नंतर ढकोबाच्या सोंडेवर पोहचलो... अतीशय उभा चढ चढून शेवटी दुपारी १ वाजता ढाकोबाच्या माथ्यावर पाय ठेवला... माथ्यावर उन्हाचे चांगलेच चटके बसत होते, पण इथून जो नजारा दिसतो त्याला तोड नाही... खाली सरळ १ कि.मी. खोल कोकणात डोकावता येतं...



उजव्या हाताला दाऱ्याघाट, जीवधन, नानाचा अंगठा आणि नानेघाट असा देखावा दिसतो... खोल कोकणात सरळ उतरणारे कातळकडे बघून वेगळाच रोमांच अंगात संचारतो...



ढाकोबाच्या माथ्यावर अनेक मधमाश्या मध गोळा करण्यात मग्न होत्या...



माथ्यावरुन दिसणारा नजारा डोळ्यात साठवला आणि उतरायला सुरुवात केली... थोडं उतरल्यावर एक ओढा लागला.. हा ओढा थेट आंबोली पर्यंत उतरतो... मागे एकदा ह्या ओढ्यातूनच उतरलो होतो, पण वाट फार काट्याकुट्यातून जाते... सोबत बरंच सामान होतं म्हणून ह्या वाटेने न जाता पर्यायी वाटेवर चालायला लागलो... ही वाट सुरुवातीला दाट कारवीच्या रानातून पुढे सरकत होती... कारवीच्या रानात दिशेचं भान राहिलं नाही तरी पण आम्ही चालत राहिलो... थोड्या वेळात पठारावर आलो आणि मस्त मळलेली पायवाट लागली... मागे वळून ढाकोबाकडे पाहिल्यावर काहीतरी चुकतयं असं वाटलं कारण मागच्या वेळेस आंबोलीहून वर चढताना ढाकोबा असा कधीच दिसला नव्हता, पण पायवाट इतकी मळलेली आहे म्हंटल्यावर गावात जाईलच असा समज करुन आम्ही डोंगर उतरतच गेलो... बरंच उतरल्यावर एका धनगराचं घर लागलं... तीथे चौकशी केल्यावर कळालं की आम्ही चांगलेच भरकटलोय... समोर दाट रान आणि दरी होती...

"हा समोर डोंगर दिसतोय ना, त्याच्या मागच्या डोंगराच्या मागे मीना नदीच्या खोऱ्यात आंबोली गाव आहे... आलात तसे परत वर जा... पठारावरुन उजव्या हाताला बरंच चालल्यावर आंबोलीला उतरणारी वाट लागेल..." अशी माहिती मिळाली...

बरेच दमलो होतो, पण वेळेत आंबोलीला पोहचणं फार आवश्यक होतं... नाहीतर आंबोलीहून जुन्नरला जाणारी बस चुकेल अशी भिती होती, मग दम न खाता परत चढायला लागलो... साधारण पाऊण तास चालल्यावर आंबोलीत उतरणारा ओढा लागला... जरा पाणी प्यायलो, दम खाल्ला आणि उतरायला लागलो... ह्या पुढची वाट ओळखीची होती... एका तासात आंबोली गावाच्या लहानश्या बसस्टँड वर पोहचलो... वाटेत कांडेसर (White-necked Stork) पक्ष्याची जोडी दिसली... ४.१५ ची जुन्नरला जाणारी शेवटची बस मिळाली... 

बस मधे बसल्यावर डोंगरातल्या त्या धनगराची आठवण झाली... इतक्या दाट रानात एकटंच कुटूंब कसं काय नांदत असेल?... वीज नाही, रात्री त्यांना भिती नसेल का वाटत?... कधी काही घडलं तर वाहतुकीचं वाहन मिळायला किमान १.५ तास तरी जंगलातून चालावं लागत असेल... का बरं हे इतक्या जंगलात राहात असतील?... त्यांची लहान मुलं कोणा बरोबर आणि काय खेळत असतील?... असे अनेक प्रश्न मनात आले... ह्या सगळ्या प्रश्नांच एकच उत्तर मिळालं आणि ते म्हणजे "हिच खरी निसर्गाची लेकरं आणि रानाची पाखरं ..."

Thursday, 10 December 2009

मी पण पळालो...

पुणे मँरेथॉनच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास लकडीपुलावर प्रचंड गर्दी होती... बरेचजण आमच्या सारखेच पहिल्यांदा मँरेथॉन मधे भाग घेत होते... सगळे चेहरे आनंदी आणि उत्साही होते... वातावरण एकदम वेगळच भारावलेलं होतं... एका शब्दात सांगायच झालं तर प्रचंड "युफोरिया" होता वातावरणात... खालच्या नदी शेजारच्या रस्त्यावर बरेचजण warmup साठी पळत होते...
"पश्या, warmup साठी नको पळायला... आत्ताच दमलो तर मेन रेस राहून जाईल" रव्या
"हो बे... रेसच्या वेळेस सुरुवातीला हळू पळूत म्हणजे warmup होवून जाईल..." मी

पुणे मँरेथॉनच्या आदल्या दिवशी रव्याला फोन केला तर म्हणाला... "नको बे... मी नाही पळत... सराव नाही अजिबात...".
त्याला म्हणालो... "अरे, सराव नसला तर काय झालं?... इच्छा तर आहे ना!... हळूहळू पळ... अगदीच दमलास तर थोडावेळ चालायचं आणि मग परत पळायचं... करावं वाटतयं तर काहीतरी कारणं देऊन टाळू नकोस... रेस पुर्ण केल्यावर फार भारी वाटेल तुला... चल आता, नेहरु स्टेडियमला जावून नोंदणी करुन येऊत..."

मी आणि रव्याने १० कि.मी. च्या रेस मधे भाग घेतला होता (पुरुषांसाठी हाफ मँरेथॉन नव्हती म्हणून)... मँरेथॉनच्या दिवशी म्हणजे ६ डिसेंबरला सकाळी ७.३० च्या सुमारास सगळी मान्यवर मंडळी आली... हाय, हँलो झालं आणि पुरुषांची फुल मँरेथॉन (४२ कि.मी.) सुरु झाली... त्यानंतर थोड्याच वेळात १० कि.मी. च्या रेसला सुरुवात झाली... वातावरणात प्रचंड उत्साह होता... त्यात we will, we will rock you ह्या गाण्यामुळे अजूनच भर पडली... पब्लिकचा भरपुर धिंगाणा चालू होता... शिवाजी महाराज, भवानी माता आणि अजून बऱ्याच जणांचा जयजयकार करत पब्लिक पळत होतं...

ठरल्या प्रमाणे आम्ही सुरुवात निवांत केली... सुरुवातीला गर्दीमुळे जोरात पळणं शक्य नव्हतच... सोबत बरेच तरुण, साठी-सत्तरीतले आजोबा, स्त्रीया, लहान मुली आणि मुलं पळत होते... आवड असली की वय, शारिरीक क्षमता आणि इतर कोणत्याही गोष्टी आड येत नाहीत ह्याचच हे प्रतीक होतं...

साधारण २ कि.मी. नंतर गर्दी जरा कमी झाली आणि पळताना मस्त ह्रीदम सेट झाला... रस्त्याच्या दोन्ही बाजूला मँरेथॉन बघायला लोक जमले होते... पळणाऱ्यां बद्दलच कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं...

पहिले वीसएक मिनीटं मी आणि रव्या सोबतच पळत होतो... मग मी जरा जोरात पळायला लागलो... थोड्याच वेळात ५ कि.मी. पुर्ण झाल्याची खुण दिसली... "५ कि.मी. झालं पण?... अजून दमलो सुध्दा नाही... सही रे!" असा मनात विचार आला... अधे-मधे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बँडच्या आवाजाने उस्ताह अजूनच वाढायचा... बऱ्याचदा दम लागणं, न लागणं हे मानसीक असतं... इच्छा असली की शरिर साथ देतच...

५ कि.मी. ते ९ कि.मी. पर्यंत पेस मेन्टेन केला... नंतर जोरात पळायला लागलो... काहीजणांना मागे टाकून मंगलदास रोडवर फिनीश लाइन पार केली... वाटलं होतं त्यापेक्षा फारच सोपं गेलं... मला रेस पुर्ण करायला ५१ मिनीटं लागली... रेस पुर्ण करुन थोडं स्ट्रेचिंग करत होतो तर रव्या सुद्धा पोहचला... रव्या पण नॉनस्टॉप पळाला... अजिबात सराव न करता...

आज एक स्वप्न पुर्ण झालं...  पुणे मँरेथॉन मधे पळायचं... आता आत्मविश्वास वाढलायं... हाफ-मँरेथॉन तर आता नक्कीच पळू शकेन...

"Ask yourself :  'Can I give more?'. The answer is usually : 'Yes'."
-Paul Tergat, Kenyan professional marathoner

(रेस नंतर एक दिवस Indian express मधलं pune newsline चाळत हो्तो... त्यावर पुणे मँरेथॉनचे फोटो आले होते आणि त्यातल्या एका फोटोत मी आणि रव्या होतो... कॉपीराईटमुळे तो फोटो इथे नाही लावला...)