Thursday 12 April 2012

पुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... दिवस तीसरा... लाडघर ते गणपतीपुळे

२३ जानेवारी २०१२

आज तशी सकाळी ६ वाजताच जाग आली होती, पण उबदार अंथरुण सोडून उठायला ७ वाजले... मग पटकन फ्रेश होवून, नाष्टा केला आणि लाडघरचा निरोप घेतला...

(दुरर्‍या दिवशीची मुक्कामाची जागा...)


(तीसर्‍या दिवशीच्या प्रवासासाठी सज्ज)








आजच्या प्रवासाची सुरुवात समुद्र किनार्‍यावरुनच झाली... लाडघर ते बुरुंडी समुद्र किनार्‍यावरुन देखील जाता येतं... खरंतर मुरुड-कर्दे ते बुरुंडी हा एकच लांबच्या लांब समुद्र किनारा आहे... सकाळच्या गार वार्‍यात सायकलवर छान वाटत होतं... समुद्र किनारी आमच्या सोबतीला फक्त सीगल पक्षी होते... अफाट समुद्र, लाटांच संगीत, ताजी आणि दमट हवा आणि कोवळं उन्ह असं छान वातवरण जुळून आलं होतं... आजच्या सफरीची सुरुवात अगदी स्वप्नवत होती... साधारण अर्धा तास आम्ही समुद्र किनारी चाललो आणि मग डांबरी रस्ता धरला... मागे वळून पाहिलं तर समुद्राचा अगदी नयनरम्य देखावा होता...



काही क्षणातच आम्ही बुरुंडी गाव मागे टाकलं आणि दाभोळच्या दिशेने निघालो... लगेचच चढ लागला... कोकणातले चढ म्हणजे जरा वेगळेच... चढ एकदम स्टीप असतो, रस्ता जेमतेम ७ फुट रुंद आणि रस्त्याच्या दुतर्फा आंबा-काजूची झाडं... आणि आज तर सकाळच्या दवाने रस्ता मस्तपैकी ओला झाला होता, जणू काही सडा मारुन सजवल्या सारखा वाटत होता...



तीघेही आपाआपल्या तंद्रीतच सायकल चालवत होतो... चढ संपला आणि परशुराम स्मारक लागलं... कोण्या एका बील्डरने ही सगळी जागा विकत घेतलीय आणि आता तो इथली वनराई नष्ट करुन बंगले उभारतोय... आणि त्यानेच हे स्मारक उभारलय...



झाडं तोडून बोडकं केलेला माळ बघून खूपच खंत वाटली... जास्त वेळ न थांबता पुढचा प्रवास सुरु केला... थोड्याच वेळात उजव्या हाताला कोळथरेला जाणारा फाटा लागला... कोळथरेहून देखील दाभोळला जात येतं,  पण आम्ही मात्र सरळ पंचनदी गावाला जाणारी वाट सोडली नाही... थोडासा चढ आणि मग मोठ्ठा उतार संपल्यावर पंचनदी गाव आलं... उतारावर सुपारीच्या बागा बघून रेवदंड्याची आठवण झाली... लहानपणी आम्ही अशा बांगामधे पडलेल्या सुपार्‍या गोळा करायचो आणि बोरं विकणारीला द्यायचो, त्याबदल्यात ती आम्हाला एक-दोन मुठ बोरं द्यायची... रोज शाळेत जाताना सुपार्‍या गोळा करणं हा आमचा उद्योग असायचा...



पंचनदी गावात एका घराच्या अंगणात रामफळं विकायला ठेवली होती... ती विकत घेतली, तर त्या आजीने आम्हाला खारीने चाखलेलं एक रामफळ असंच खायला दिलं... पुण्याहून सायकलने आलोय असं कळल्यावर त्या आजी खूप आनंदी झाल्या... घरातल्या सगळ्यांना बोलवून आमच्या बद्दल सांगीतलं आणि आमचं खूप कौतुक केलं... पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा घेवून आजींचा नोरोप घेतला... पंचनदीहून अजून १० कि.मी. चा चढ-उतार संपवून आम्ही दाभोळला पोहचलो...

(दाभोळच्या उतारावर प्रसाद)


(दाभोळ जेट्टी)


दाभोळहून फेरीने धोपवे गाठलं... धोपवे सोडलं आणि चढ लागला... दुपारच्या ११ च्या उन्हात चढावर जीव कासावीस होत होता... मान खाली टाकून एक-दोन-तीन-चार असे पेडल्स मोजत हळू-हळू चढ संपवला आणि एका झाडाखाली आडवे झालो... समोरच दिवाळं निघालेला एराँनचा प्रकल्प उभा होता...



रस्त्यावर अजीबातच रहदारी नव्हती, एकंदरीतच इथला सभोवताल भकास वाटत होता... चढावर अंगातली सगळी ताकद संपली होती, मग पंचनदीमधे घेतलेली रामफळं बाहेर काढली... आंबट-गोड अशी मस्त चव होती... घोटभर पाणी प्यायलो आणि गुहाघरचा रस्ता धरला... पावूण तासात गुहाघर गाठलं...

उन्ह खूप होतं आणि जेवणाची पण वेळ झाली होती, मग इथेच जेवून थोडा आराम करायचं ठरलं... वरण-भात, पोळी-भाजी, सोलकडी आणि वाटीभर आमरस असं पोटभर जेवलो आणि आराम करण्यासाठी गुहाघरच्या समुद्रकिनारी पोहचलो... गुडघाभर पाण्यात उभं राहिल्यावर गार लाटांमुळे एकदम प्रसन्न वाटलं... पांढर्‍याशुभ्र फेसाळ लाटा उन्हात अजूनच चमकत होत्या... खोलवर समुद्र निळा-हिरवा भासत होता... भर उन्हात सुद्धा समुद्रकिनारी छान वाटत होतं...







एखाद तास आराम केल्यावर पुन्हा सायकलींवर स्वार झालो... घरुन निघताना जरा कमीच पैसे सोबत घेतले होते, म्हणून मग गुहाघरला थोडे पैसे काढले आणि चिपळूण कडे जाणार्‍या चढाला लागलो... जेवणानंतर चढ नकोसा होतो अगदी, पण आजचा मुक्काम गणपतीपुळ्याला करायचा होता आणि ते अजून खूप दुर होतं, म्हणून हळू-हळू का होईना पुढे सरकत होतो... चढावर एकजण सायकल ढकलत निवांत चालत होता... हाय-हैलो झाल्यावर कळालं की तो रशीयावरुन ३ महिन्याच्या सुट्टीवर आलाय... मुंबईहून त्याने प्रवास सुरु केला होता आणि शेवट त्याला अंदमानात करायचा होता, पण अधे-मधे कुठे थांबायच हे त्याने ठरवलं नव्हतं... एकदम रमता-जोगी प्रकारचा तरुण होता... थोड्या गप्पा झाल्यावर त्याला बाय करुन आम्ही पुढे निघालो... जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला "वेळणेश्वर आणि हेदवी" अशी पाठी दिसली... चिपळूणचा रस्ता सोडला आणि उजव्या हातचा रस्ता धरला... अगदी निवांतपणे आम्ही सायकली चालवत होतो... अधून-मधून झाडांच्या सावलीत थोडावेळ आराम करायचो...वेळणेश्वरच्या जरा आधी त्या रशीयन तरुणाने आम्हाला गाठलं आणि म्हणाला,"Today, can I stick to you guys for the rest of the journey?"...

आम्ही होकार दिला आणि त्याला आमच्या टीम मधे शामील करुन घेतलं... त्याच्या सोबत अजून गप्पा झाल्यावर कळालं की, साहेबांकडे चांगला नकाशा सुद्धा नाहिये, नीट माहिती न काढताच साहेब सफरीला निघालेत आणि ते पण एका अनोळखी देशात... तरी सुद्धा तो एकदम निवांत होता...

हेदवी साधारण ५-६ कि.मी. असताना उजव्या हाताला वेळणेश्वरचा फाटा लागला... इथून वेळणेश्वर २-३ कि.मी. अंतरावर होतं... वेळणेश्वरला न जाता आम्ही हेदवीच्या वाटेने पुढे निघालो... हेदवीला गणपतीचं दर्शन घेतलं आणि फेरी पकडण्यासाठी तवसाळच्या दिशेने सायकली पळवल्या... सारखे छोटे-मोठे चढ-उतार लागतच होते... गेले २ तास समुद्र दिसलाच नव्हता आणि अचानक एका वळ्णानंतर समुद्र दिसला...





थोडावेळ समुद्राला लागूनच रस्ता होता आणि मग परत चढ सुरु झाला... चढत असताना उजव्या हाताला समुद्राचा नितांत सुंदर देखावा सतत नजरेत होता... चढ संपताच, देखावा बघण्यासाठी थांबलो...



(यशदीप, मी आणि रमन वोल्ह्कोव (रशीयन तरुण))


इथून थोड्या वेळातच तवसाळ गाठलं... लिंबू सरबत प्यायलो आणि फेरीत बसलो... फेरीच्या टपावर चढून समुद्र न्याहाळत बसलो... आज खूपच चढ-उतार होते... पाय जाम दमले होते आणि गणपतीपुळे अजून निदान २० कि.मी. दूर होतं... जयगडच्या जेट्टीवर पोहचलो तेव्हा सुर्य कलत आला होता... जेट्टी नंतरचा चढ संपल्यावर उजवीकडे जयगडला न जाता डावीकडची गणपतीपुळ्याची वाट धरली... आजचा सुर्यास्तपण सायकल वरुनच अनुभवला...





सुर्य मावळातच भरभर कळोख पसरु लागला आणि आमच्या सायकलीपण जोरात पळू लागल्या... साधारण एक तासात २० कि.मी. अंतर कापून आम्ही गणपतीपुळ्याला पोहचलो... आमच्या मागे-मागे येत तो रशीयन पण पोहचला... "you guys are crazy" असं म्हणत त्या रशीयन तरुणाने आजच्या सोबत केलेल्या प्रवासाच वर्णन केलं... त्याला खूप भुक लागली होती, म्हणून तो चायनीज हॉटेल शोधण्यासाठी गेला आणि "जमलं तर उद्या वाटेत भेटू" असं म्हणत आम्ही देखील मुक्कामाची जागा शोधू लागलो... एका जागी स्वस्तात मुक्कामाची सोय झाली... गरम पाण्याने अंग शेकत आंघोळी उरकल्या आणि जेवणासाठी बाहेर पडलो... प्रसादचा डावा गुडघा खूपच दुखत होता... त्याला चालताना प्रचंड वेदना होत होत्या... आजची रात्र आराम करुन जर बरं वाटलं तर पुढे येतो नाही तर इथूनच बसने पुण्याला जातो, असा त्याचा विचार होता... मला आणि यशदीपला पण तेच योग्य वाटलं...

विमुक्त